24 PENS
19/03/2026
'ती' आता प्रचंड भाव खायला लागली आहे. छोट्याशा पिळदार दंडांच्या पोरापासून ते निवृत्त झालेल्या ज्येष्ठांपर्यंत माझ्यासारख्या प्रत्येकाची हीच तक्रार आहे.
तशी 'ती' वरवर नखरेल भासत होतीच...
आता थोडा जास्तच नखरा दाखवू लागली आहे.
यापूर्वी, तिला साद घालताच, दोन दिवसांचा उशीर का होईना, ती घरी यायची!
तिला घेऊन येणारा म्हणायचा, “आमचं काय बघताय का नाय?”
आम्ही खुश होऊन, “घे बाबा!” म्हणत, थोडा ‘अर्थ’प्रसाद त्या पोहोचकर्त्याच्या हातावर ठेवायचो.
तिला आमच्याकडे पोहोचवणारा घराकडे पाठ करून गेला की, आम्ही तिला व्यवस्थित न्याहाळायचो.
तिचं रूपडं आहे तसंच आहे की बदललं आहे, हे पाहायचो.
तिच्या डोक्यावर एक उपकरण लावून तिला ताप आला आहे की नाही, हे तपासायचो.
एखादी प्रशस्त जागा तिला मिळवून दिली की आमचं काम संपायचं.
मग कधीतरी हळूच जाता-येता तिच्याकडे पाहून स्मित द्यायचो; ती सुद्धा मनमुरादपणे दाद द्यायची.
आता मात्र तिचा नूर बदलला आहे. तिचा एक पाय आखातात, तर दुसरा पाय भारतभूमीच्या वेशीवर आहे.
कुण्या दूरदेशीच्या राज्यकर्त्यांनी एकमेकांना ठोसे लगावणे सुरू केल्यापासून तिचं भेटणं तर मुश्किल, पण दिसणंसुद्धा दुरापास्त झालं आहे.
तिचं आगमन मोठ्या धुमधडाक्यात करायचं असा मानस मी गेले आठवडाभर बाळगून होतो.
पण 'ती' काही जवळ यायचं नाव घेत नव्हती.
ज्या खासगी कचेरीत तिचा हमखास मुक्काम असतो, तिथे मी तीन-चार वेळा जाऊन आलो. तेव्हा कचेरीतील सेवादाते म्हणाले,
“अहो, एका वर्षात बारा वेळा आम्ही तुमची आणि तिची भेट घालून देऊ शकतो.
तुम्ही चक्क पंधरा वेळा भेटला आहात तिला.”
त्यावर मी, “अहो साहेब, उद्या सण आहे. ती नाही आली तर आम्ही तो साजरा कसा करायचा?” हा सवाल विचारला.
तेव्हा समोरच्याने, “ते काही नाही. एक तारखेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर तुमची आणि तिची भेट नक्की होईल,” असं सांगितलं.
मी आपला मख्ख चेहऱ्याने, उदास भावनेने तिच्याकडे पाहत राहिलो.
“आता कसं वाटतंय...?” ह्या तिच्या प्रश्नाने, विशी-पंचवीशीतील तरुणाला गल्लीतल्या सौंदर्यवतीचं महत्त्व तिचं लग्न होईपर्यंत कळत नाही, या शेऱ्याची आठवण करून दिली.
त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर ‘वैताग मुद्रा’ पाहून सोबत आलेल्या मित्राने मला विचारलं,
“ती दुसऱ्या समूहाची असली तर चालेल ना?”
मी विचारलं, “कुठल्या समूहाची? काय बोलतो आहेस तू?”
मित्राने उत्तरासोबत प्रश्न केला,
“तिच्या डोक्यावर पिवळ्या ऐवजी निळी टोपी चालेल ना?”
क्षणभर विचार करून...
मी म्हणालो, “चालेल काय, पळेल!”
अखेरीस मित्राने भारतऐवजी एच.पी. गॅसच्या लालभडक टाकीच्या रूपात तिला माझ्यासोबत घरी धाडलं.
परंतु, तिला पाहून ‘चुलबाई’ आणि ‘इंडक्शनराव’ दोघेही रुसून बसले आहेत.
*कालाय तस्मै नमः*
-अमोल काळे
© Amol Arvind Kale
Mobile: 8390800009
Email: [email protected]
#मराठीलेखन #टंचाई #ब्लॉग
18/08/2025
*शिंकानसेन*
'शिंकानसेन' हे नाव ऐकायला विचित्र-अनोळखी वाटत असले,तरी *'वक्तशीरपणा' आणि 'दर्जेदार सेवा' ही त्याची ओळख आहे.*
मागील आठवड्यात जपानच्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला स्टेशनवर पोहोचायला फक्त पस्तीस सेकंद उशीर झाला,म्हणून तिच्या प्रवाशांची माफी मागून त्यांना तिकीट रकमेचा परतावा देण्यात आला.
खरेतर अपवादात्मक स्थितीत तांत्रिक बिघाडामुळे वा नैसर्गिक संकटामुळे कोणत्याही सेवेत येणारा व्यत्यय हा समजून घेण्यासारखा आहे.
भारतात मात्र शहरी,स्थानिक लोकल सेवा असो अथवा मेल,एक्सप्रेस म्हणून धावणाऱ्या रेल्वे गाड्या;त्यांना होणारा तासन्तासाचा विलंब हा अक्षरशः प्रवाशांचे हाल करणारा ठरतो.
अशा विलंबानंतर भारतीय रेल्वे विभाग प्रवाशांना परतावा देणे तर दूरच, परंतु साधी दिलगिरीही व्यक्त करत नाही.
राज्य परिवहन महामंडळ,शहरी बससेवाही याहून वेगळ्या नाहीत !
थातूरमातूर कारणे देत,कार्यालयीन भाषेतील स्पष्टीकरण आणि पुन्हा *_'येरे माझ्या मागल्या'चाच_* अनुभव आपल्या प्रवाशांना मिळत जातो.
तसे पाहता जपानची बुलेट ट्रेन आणि भारतीय रेल्वे यांची तुलना करणे उचित नाही.
शिंकानसेनला होणारा उशीर हा सरासरी वीस सेकंदांचा आहे.
परंतु,*केवळ पस्तीस सेकंदांचाही हिशेब जो सेवा पुरवठादार ठेवत असेलआणि त्यावर माफी मागत असेल,तो व्यावसायिक नीतिमूल्ये कशी जपली जातात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.*
यापूर्वी 2018 मध्येही प्रवाशांची अशीच माफी दिरंगाई झाली म्हणून कंपनीने मागितली होती.
वेळेचे वाटणारे महत्व याहून अधिक ते कोणते ?!
आता जपान रेल्वेज ग्रुप(JR Group) सारख्या खासगी कंपनीमुळे तिथले संचालन इतके जबरदस्त आहे असे मत बरीच मंडळी मांडतील.
जपानी नागरिक सुद्धा 'शिस्त हे जीवनमूल्य' मानतात.
तेथील सार्वजनिक मालमत्तेबाबत ते किती *'स्वामित्वदर्शक दृष्टिकोन'* बाळगतात हे आपण सारेच जाणून आहोत.
या उलट भारतीय नागरिक राजकीय,सामाजिक संघर्ष निर्माण होताच, रेल्वे गाड्या,राज्य-शहर परिवहन बसेसवर कसा हल्ला चढवितात याबद्दल अनेकदा आपण सगळे नुसती चर्चाच करतो.
असे प्रकार होऊ नयेत,ही बाब स्वप्नवतच राहते !
शिंकानसेनने व्यक्त केलेल्या दिलगिरीनिमित्त भारतीय व्यवस्था व भारतीय नागरिक हे दोघेही *एकमेकांविषयी 'आदर,आपुलकी,जबाबदारी' ही आदर्श मानके आत्मसात करतील.* अशी आशा बाळगायला हरकत नाही.
-अमोल काळे
© Amol Arvind Kale.
[email protected]
Mobile:8390800009
17/11/2022
*पडे मज विसर*
तुमच्या आमच्या गरजा फार
दारात गाड्या दोन,तीन,चार
खरेदीस पुढे येती 'कौतुकाचे विचार'
'ट्रॅफिकला देई आमंत्रण वर्तुळाकार'
रस्त्यासहित 'समस्येचा वाढतोय आकार'
मला त्याचे काय 'स्वप्न झाले साकार'
"माहीत नाही किती होतोय ?"
प्रदूषणाचा 'स्वास्थ्यावर वार',
'असह्य धरणी' हाच याचा सार
परिस्थितीवर करतो सहजी टीका.....
पडे मज विसर !
"उद्या आहे फंक्शन,...ये तू यार,
बिघडेल माझे स्टेट्स;आण तुझी कार"
-अमोल काळे
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune