Rashtra Sanchar
14/12/2025
‘निसर्गा’लाच ‘वनवास’...!
‘तपोवन’ ला स्थगिती; तरीही ‘कत्तली’चे भूत ‘मानगुटी’वरच
नव्या वर्षात नाशिकच्या पावन भूमीत भव्य असा ‘कुंभमेळा’ भरणार आहे; त्यासाठी देशभरातून हजारो साधू हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या साधूंच्या ‘सरबराई’ची चिंता गेल्या काही दिवसांपासून राज्य शासन आणि राज्यकर्त्यांना भेडसावू लागली आहे. त्यांच्या निवासासाठी ‘शाही’ व्यवस्था असलीच पाहिजे; असा ‘हट्ट’ राज्यकर्त्यांनी धरला आहे. त्यासाठी म्हणे राज्य शासनाने नाशिकसह संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक अशा ‘तपोवना’ची कत्तल करण्याचा अजब उपाय शोधला आहे; शासनाच्या या निर्णयाला सत्तेत असलेल्या पक्षांनीच विरोध करुनही त्यात फारसे यश आले नव्हते. त्यामुळे राज्यकर्त्यांमध्ये हा ‘भातुकली’ चा ‘खेळ’ सुरु आहे का असा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे, परंतु एवढा विरोध होत असतानाही सरकारच्या निर्णयात तसूभरही बदल झाला नाही. अखेर हरित लवादाने या निर्णयात हस्तक्षेप करत या कत्तलीला तूर्त स्थगिती दिली आहे; त्यामुळे यासाठी आघाडीवर असणारे ‘संकटमोचक’ निश्चितच हवालदिल झाले असतील. परंतु ही केवळ स्थगिती असल्याने कत्तलीचे भूत अजुनही मानगुटीवर कायम आहे. वास्तविक पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि त्याचा लाभ समाजाला व्हावा या उदात्त हेतूने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी दूरदृष्टी ठेऊन पुरातन काळात आपल्या अभंग वाणीतून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे! पक्षी ही सुस्वरे आळविती!! असा महान संदेश संपूर्ण जगाला दिला. त्यांच्याच या अभंगाची समाजाला पदोपदी प्रचिती येत आहे;आपल्या स्वार्थासाठी आप्पलपोटीपणासाठी माणसाने लाखो झाडांची आतापर्यंत अक्षरश: ‘होळी’ केली आहे. त्याचे भीषण दुष्परिणामाचे भोग आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत; तरीही त्यामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. वास्तविक पुरातन काळात खुद्द प्रभू श्री. रामचंद्रांनाही तब्बल १४ वर्षे वनवास भोगावा लागला; आता या कत्तलीमुळे थेट निसर्गावरच हे अनोखे ‘संकट’ आले आहे. लवादाने स्थगिती दिली असली तरी शासनकर्ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने पण का होइना केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी या हजारो झाडांची कत्तल करणार असे स्पष्ट संकेत सद्यपरिस्थितीवरुन मिळत आहेत; त्यामुळे आताच्या कलियुगात खुद्द ‘निसर्गा’ लाही हा ‘वनवास’ भोगावा लागणार हे निश्चित. सध्याच्या या घडामोडींवर दैनिक ‘राष्ट्र संचार’ ने टाकलेला हा प्रकाश...!
#तपोवन #सयाजीशिंदे #नाशिक #पर्यावरण #कुंभमेळा
24/10/2025
अस्वस्थ दगडांनी उठविले बदनामीचे ' मोहोळ '
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंग च्या जमिन प्रकरणाने अक्षरश: जेरीस आणले आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत मोहोळ आणि कोथरूड स्थित बड्या बिल्डरांमधील धागेदोरे उसवत त्यांच्या प्रतिमेला आणि चारित्र्याला शक्य तितकी हानी पोहोचविण्याचा उघड प्रयत्न चालविला आहे. रवींद्र धंगेकर हे सध्या शिवसेनेचे नेते आहेत. तथापि महायुतीचा धर्म पाळावा आणि एकमेकांच्या नेतृत्वावर टोकाची टीका टिप्पणी करू नये असे म्हणत अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात ब्राह्मण संघाच्या पुरस्कार सोहळ्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांनी ' दंगा कमी करावा ' अशी सूचना केली परंतु त्याचवेळी पुण्यातील गुन्हेगारी बाबत आवाज उठवीत असल्याबद्दल त्यांनी जाहीर पाठ राखण देखील केली. या सर्व प्रकरणाला मोहोळ विरुद्ध धंगेकर अशा सामन्याची किनार असली तरी याला अनेक अंतर्गत कंगोरे आहेत.
मोहोळ यांना भावी मुख्यमंत्री म्हणून एका गटाकडून प्रोजेक्ट केले जात आहे. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मनात असे आहे, असे भाजपा वर्तुळात म्हटले जाते. त्यामुळे भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ यांच्याकडून दुखावलेले काही नेते धंगेकर यांच्या पाठीमागे आपले छुपी ताकत उभी करीत असल्याचे दिसते.
शिवसेनेचा वाली
एकनाथ शिंदे यांनी जरी नाराजी व्यक्त केली असली तरी पुण्यातील शिवसेना रुजण्यासाठी आणि वाढण्यासाठी धंगेकर यांच्यासारखा एखादा लोकनेता गरजेचा आहे, हे त्यांना माहित आहे. सध्या शिवसेनेत एकही चारित्र्यसंपन्न आणि थेट भिडणारा नेता नाही. नीलम गोरे यांचा अपवाद वगळता पुण्याला सभ्य चेहऱ्याचे नेतृत्व अध्यापि लाभलेले नाही. संविधानिक पदांमुळे नीलम गोरे यांना मर्यादा असल्याने थेट लोकात जाऊन शिवसेना विस्तार करणार नेतृत्व धंगेकर यांचे शिवाय दुसरे कोणीही असल्याचे सध्या दृष्टिक्षेपात नाही. भाजप हा मित्र पक्ष असला तरी नैसर्गिक न्यायाने शिवसेनेची ताकद जितकी कमी होईल तितकाच प्रयत्न या पक्षाकडून चालविला जाणार.
धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची चर्चा वाढल्यानंतर आज शिवसेनेतील सेकंड इन कमांड उदय सामंत यांनी, ' पुण्यात जर हे करायचे असेल तर नवी मुंबई मध्येही गणेश नाईक यांच्या बद्दल विचार करावा लागेल ' असे वक्तव्य करून थेट शहाला काट शह देण्याचा प्रयत्न केला.
'निर्बंध मुक्त धंगेकर' अधिक धोकादायक
आज धंगेकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरील शिवसेनेचे लोगो काढून ' एक पुणेकर ' अशी आपली प्रतिमा पुन्हा एकदा ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे धंगेकर यांना आपण शिवसेनेतून काढून टाकू शकलो, असा एक अविर्भाव भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. परंतु शिवसेनेतल्या धंगेकरांपेक्षा ' मोकळे धंगेकर ' हे अधिक त्रासदायक ठरू शकतात याची कल्पना कदाचित भाजपवाल्यांना नाही.
धंगेकर यांनी भांडवलशाही विरोधातील हे युद्ध पुकारले आहे. कदाचित जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रामाणिक उद्देश नसेलही, परंतु सध्या तरी कोथरूड स्थित भाजपाचे सत्तेचे केंद्रीकरण आणि लब्ध प्रतिष्ठितांचा पक्ष अशी प्रतिमा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर साम्राज्यशाहीच्या भावनेच्या विरोधात लढणारा एक सामान्य नागरिक म्हणून एखादे नेतृत्व समोर उभे ठाकले तरच पुढची लढाई आव्हानात्मक होऊ शकते हे सर्वजण जाणून आहेत.
मोहोळांना सबुरी गरजेची
मुरलीधर मोहोळ हे संघीय राजकारणापासून भाजपशी जवळीकता राखून आहेत. चंद्रकांत दादा यांचा पुण्यात प्रवेश झाल्यानंतर त्यांचे आमदारकीचे तिकीट कापले गेले परंतु त्यावेळी संयम राखत ते भाजपामध्ये टिकून राहिले. आमदार होणारा व्यक्ती अचानक नगरसेवक पदावर समाधान मानू लागला . पण नंतर त्यांना स्थायी समिती मिळाली , महापौर पद मिळाले आणि आता थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत त्यांची उडी गेली . हा प्रवास केवळ त्यांच्या संयमतेचा आणि निष्ठेचा आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना एक आत्मविश्वास आला. मात्र रात्री _ अपरात्री उपलब्ध होणारे गणेश मंडळाचा कार्यकर्ता असणारे अण्णा आता वारंवार फोन करून देखील उचलत नसल्याच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून चंद्रकांत दादा, मेधाताई कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये असलेला सुप्त संघर्ष जोर धरत आहे.
भलेही दिवाळीच्या निमित्ताने अण्णा _ दादांच्या गाठीभेटी आणि गोड फराळाचे सोहळे घडत असले तरी भाजपामध्ये अंतर्गत वादाची चर्चा उघड उघड होत असते.
कोथरूडमध्ये उभा राहत असलेल्या गगनचुंबी इमारती इतकेच मोहोळ यांचे नेतृत्व आकाशापर्यंत पोहोचले. या ' मजल्यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे नातेसंबंध ' देखील कोथरूडकर यांना चांगले माहित आहे. परंतु ' अण्णांचा सामान्य लोकांना त्रास नाही ' म्हणून आजपर्यंत कधी कोणी फारसा गळा काढला नाही. धंगेकरांच्या रडगाण्याने मात्र अशा अनेक गळ्यांना विरोधाच्या सुरात सूर मिसळण्याची संधी मिळाली.
मोहोळ यांचे नाव अधिक वरच्या स्तरावर जाण्यासाठी एक वातावरण पोषक बनत असताना अशा वेळेला त्यांच्या विरोधात हे वातावरण निर्माण होणे हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे.
मोहोळ हे लब्ध प्रतिष्ठित आहेत. शिवाय ते आता गर्भश्रीमंत देखील आहेत. त्यांच्या बांधकाम व्यावसायिक भागीदारीवर आजपर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही. कोथरूड मधले सर्वच बिल्डर त्यांच्याच आश्रयाखाली मोठे झाले. त्यात लपलेले अर्थकारण त्यांनी कधी फार झाकून ठेवले नाही. पण सत्तेच्या आणि प्रतिष्ठेच्या पायदानावरून चढत असताना अर्थकारणाचे डोलारे सांभाळण्याचे भान देखील असावे लागते . सामान्य नागरिक _ मतदारांना आपला नेता फार श्रीमंत झाला तर चालते पण त्यात तो नॉट रिचेबल राहू लागला तर फारसे पसंत पडत नाही. त्यामुळे एक तर ही श्रीमंती झाकून ठेवावी लागते नाहीतर सतत _ सहज उपलब्धता असावी लागते .
शिवाय महत्त्वाकांक्षी राजकारणामध्ये आर्थिक साम्राज्यवाद विस्तारताना कुठे थांबावे हेही कळले पाहिजे. कदाचित जैन बोर्डिंग च्या व्यवहारात मोहोळ यांचा थेट संबंध नसेलही . परंतु अडीच हजार कोटीची जमीन 300 कोटींना शिवाय अल्पावधीत साऱ्या परवानग्यांचा तामझाम हे केवळ एखाद्या बिल्डरचे काम नाही हे पुणेकर जाणतात .
इथे मात्र गडबड झाली . त्यामुळे मोहोळ यांच्या समोरील विरोधकासह पक्षांतर्गत शत्रू आणि व्यावसायिक शत्रूंना देखील यामुळे त्यांच्यावर आघात करण्याची मोठी संधी निर्माण झाली. नवलाखासारखे बिल्डर्स देखील आता बाहेर येऊन आपण मोहोळ यांच्या कारभाराचे आपण कसे व्हिक्टीम आहोत याच्या कहाण्या सांगत आहेत.
अर्थात यामुळे कोथरूड मधील मतदानावर किंवा मुरली अण्णांच्या नेतृत्वावर तातडीने काही फरक पडणार नाही. यामुळे जैन समाज नाराज झाला तरी त्यांच्या मतांचा टक्का पाहता त्याचाही अण्णांच्या राजकारणावर फार फरक पडणार नाही पण निवडणुकीच्या कालावधीत माध्यमे जेव्हा राजकारणाचे गुन्हेगारीकरण, व्यावसायिकरण यावर बुलेटीन चालवतील त्यावेळी शिरसाट, गायकवाड, राठोड, मुंडे यांच्यासह पुण्याच्या मुरली अण्णांची देखील छबी असेल आणि त्यावरही चर्चा घडेल. हे मोहोळ यांच्या उभरत्या राजकीय प्रतिमेला परवडणारे नाही. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपा नेतेच प्रारंभी त्यांच्या मागे उभे राहावे लागतील. केवळ कोटीभास्कर, बढेकर, गोखले, आसबे यांच्या शुभचिंतनाने ही प्रतिमा सुधारणार नाही.
निवडणुका लक्ष्य
धंगेकर यांचा गोंधळ हा महापालिकेच्या निवडणुकांकरिता चाललेला आहे , असा आरोप भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात होतो. तो काही अंशी खरा देखील आहे,
त्याचवेळी मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवण्याबाबत देखील एकवाक्यता होत आहे. परंतु मोहोळ यांच्या एकट्याच्या सामर्थ्यावर महापालिकेच्या शंभरहून अधिक जागा निवडून येतील अशी परिस्थिती नाही. हडपसर, वडगाव शेरी, खुद्द कोथरूड येथे त्यांचे अनेक सुप्त हितशत्रू दडलेले आहेत. त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांचे नेतृत्व खुजे करण्यासाठी यंदा अंतर्गत सक्रियता दाखवेल यात संदेह नाही . मोहोळ यांच्या विरोधकांना सत्ता भाजपचीच हवी आहे, पण ती केवळ एकट्या ' मोहोळ याच्या चेहऱ्यावर ' खेचून आणलेली नाही, हे त्यांना पक्षाला दाखवायचे आहे. त्याहीपूर्वी उमेदवारी वाटपामध्ये मोहोळ यांचे संभाव्य एकचालुकानुवर्तित्व देखील त्यांना मोडून काढायचे आहे. अशा वेळेला मोहोळ विरोधी गटातील नेत्यांना निर्णयप्रक्रियेत आपला ' ही 'पर्याय समोर आणण्यासाठी आणि मोहोळ यांना थोडे शाडोमध्ये ठेवण्यासाठी धंगेकर यांचा त्यांना आधार वाटतोय.
त्यामुळे पुढील वर्ष हे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खरे आव्हानात्मक वर्ष असेल . धंगेकर यांच्या आघातामुळे हे बदनामीचे मोहोळ उठले आहे, परंतु त्यासाठी असंतुष्ट, भयग्रस्त स्वपक्षीयांनीही खडे मारले आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे . त्यासाठी केवळ 'जनता दरबारा' पूरते नव्हे तर प्रत्येक कॉल ला रिस्पॉन्स करणारे आणि चौकटीतून बाहेर येत सामान्य कार्यकर्त्यांना भिडणारे अण्णा पुन्हा दिसले पाहिजेत.
अनिरुद्ध बडवे
www.rashtrasanchar com
#राष्ट्रसंचार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nal Stop, Erandwane
Pune
411004