Sahgami Foundation
08/05/2026
नैना व रेश्माचे खूप खूप कौतुक ❤️
आज दहावी एसएससी बोर्डाचा निकाल लागला आणि खरंच डोळे पाणावले. आमच्या पाठशाळेतील दोन विद्यार्थिनी नैना व रेश्मा या खूप उत्तमरीत्या मार्क देऊन दहावी मध्ये यशस्वीरित्या पास झाल्या याचा गर्व वाटत आहे. शिक्षणाची गोडी लावून मुलांना शिक्षण प्रवाहात आणताना त्यांच्या अनेक अडचणी आम्ही पाहत असतो.
सांगायचं तर रेश्मा सारख्या विद्यार्थिनीला आज 63.6% मार्क मिळाले आहेत. पण तिचे पहिली ते आठवी पूर्ण शिक्षण बिहारमध्ये हिंदी माध्यमातून झाले आहे. नववीमध्ये अचानक काही कारणास्तव तिला पिंपरी चिंचवड येथे यावे लागले आणि त्यावेळेस आठवीत 87% मिळाले असले तरी कुठल्याही शाळा तिला हिंदी माध्यमातील विद्यार्थी असल्यामुळे मराठी माध्यमात घेण्यासाठी उत्सुक नव्हत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर ते आयुष्यभरासाठी होईल व नापास झाल्यास शाळेच्या निकालाचा टक्का घसरेल, असे सगळ्या शाळांना वाटत होते. परंतु त्यात हिंदी माध्यमाच्या शाळा कमी असून, असलेल्या शाळेचे अंतर घरापासून दूर असल्यामुळे नवीन मुलीला इतक्या दूर कसे पाठवायचे हा खूप मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होता. अनेकांशी विचार विनिमय करून शेवटी तिला मराठी माध्यमातच टाकायचे ठरवले. पण त्यावेळेस ही चिंता होती की मुलगी पास तरी होईल ना?
या दोन वर्षात रेश्माने जिद्दीने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्यासाठी तिला खूप त्रासही झाला. परंतु यावेळेस नैना सारख्या तिच्या जिवलग मैत्रिणीने तिला मदत केली. आज या दोघींनीही इतके छान मार्क मिळवल्याचा आम्हाला खूप आनंद झाला. अशा मराठीचे अजिबात ज्ञान नसलेल्या विद्यार्थिनीला आपल्या वर्गात सामावून घेतले. यासाठी केशवनगर भाग शाळा रावेतचे प्रिन्सिपल पवार सर आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार🙏🏻🙏🏻
रेश्मा व नैनाचे खूप खूप कौतुक ❤️❤️
-टीम सहगामी फाउंडेशन
01/05/2026
याचसाठी केला अट्टाहास ❤️
आज एक मे, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करताना पहिल्यांदा आठवण येते ते म्हणजे शाळेचा वार्षिक निकाल लागायचा याची. बालपणीचा काळ आठवतो, एक मे ला रिझल्ट लागणार म्हणून आम्ही खूप उत्सुक असायचो. आजकालच्या खाजगी शाळांमध्ये निकाल लागण्याची तारीख वेगळी असल्यामुळे गेले ते दिवस असे म्हणता येईल. पण मस्ती की पाठशाळेतील आमचे विद्यार्थी सरकारी शाळेत जात असल्यामुळे पाठशाळेमध्ये एक मे या तारखेला विशेष महत्त्व असतं. पालकांचे समुपदेशन करून मुलांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना सरकारी शाळेकडे वळवताना ही मुलं किमान वर्षभर शाळेत टिकली पाहिजे असे वाटत रहाते. एकदा का ही मुलं शाळेत रूळली की आपोआप पुढे शिकतात हा अनुभव आलाय. आता मस्ती की पाठशाळेतील बरेचसे विद्यार्थी हे नियमित शाळेत जातात व शाळेतील विविध स्पर्धांमध्येही यशस्वी होत आहेत. त्यामुळे त्यांचा शाळेचा वार्षिक निकाल काय लागतो याची आम्हाला कायम उत्सुकता असते.
आणि आज सांगायला खूप आनंद होत आहे की मस्ती की पाठशाळेतील सर्वच विद्यार्थी उत्तम मार्कांनी पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत. याचे श्रेय आमच्या पाठशाळेतील सर्व शिक्षकांना जातेच त्याहीपेक्षा जास्त त्यांना शाळेत कायम सांभाळून घेणारे महानगरपालिका शाळा क्रमांक 97 रावेतच्या सर्व शिक्षकांना जाते. शाळाबाह्य मुलांना सामावून घेताना शाळेतील शिक्षकांना बऱ्याच अडचणी येत असते. कारण ही शाळाबाह्य मुलं वयाप्रमाणे कुठल्याही इयत्तेत शाळेत दाखल केली जातात व अनेकदा अशा मुलांना प्राथमिक ज्ञानही नसते. अशा वेळेस या मुलांना टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील शिक्षकांना बरेच प्रयत्न करावे लागतात.
त्यामुळे मस्ती की पाठशाळेतील सर्व शिक्षकांच्या व रावेत शाळेतील सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांनी आज सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या पास झाल्यामुळे सर्व मुलांचे खूप खूप कौतुक व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
-टीम सहगामी फाउंडेशन
Click here to claim your Sponsored Listing.